संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही: भाजपचा आक्रमक पवित्रा
राजकारण

संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही: भाजपचा आक्रमक पवित्रा

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असल्या कारणाने राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च ते १० मार्च या कालावधीत होत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी कालावधीसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, ”महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपाने घेतली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संजय राठोड हे दोषी आहेत, असा थेट आरोपच भाजपने केला आहे. त्यामुळेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी यावेळी संजय राठोड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ”आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा निलाजरा प्रयत्न सुरु आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर एव्हढंच लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या राजीनाम्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करु शकतात. मात्र सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही,” असं अतुल भातखळकर म्हंटलं आहे.

दरम्यान संजय राठोड यांच्यावर अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी टीका केल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. ”छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर ते का बोलत नाहीत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने सुरु आहे हे गृहमंत्र्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

त्याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत असल्याची टीका त्यांनी केलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण यांची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तावेज उपलब्ध आहे,साक्षीदार आहे. चौकशी होत नाही म्हणून सरकारवर दबाव भाजपा आणत आहे. महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्यशासक म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आक्रमक आहे. पूजा चव्हाण मृत्यूचा छडा लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.