हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही: देवेंद्र फडणवीस
राजकारण

हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही: देवेंद्र फडणवीस

देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास सुरु असताना स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथे आढळून आला आहे. मनसुख हिरेन असे गाडीमालकाचे नाव आहे. या घटनेनंतर विधानसभेत या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”मृतदेहाचे फोटो पाहिले असून हात बांधून कोणी आत्महत्या करु शकत नाही, असं सांगत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ”“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली होती. गाडीचं स्टेअरिंग जॅम झालं होतं मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे. घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला.

दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “मनसुख हिरेन यांच्या मालकीची गाडी नव्हती. मात्र मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. ठाणे पोलीस तपास करत असून शवविच्छेदन करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, ”ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नसून इंटिरिअरसाठी यांच्याकडे देण्यात आली होती, मात्र बिल थकल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती. तसंच हिरेन यांचे हात बांधण्यात आले नव्हते असं सांगत महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम आहेत. असेही त्यांनी नमूद केले. मात्र पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप करत हे कोणाला वाचवण्यासाठी सुरु आहे ? अशी विचारणा यावेळी फडणवीसांनी केली.