भाजप-शिंदे गटात वाद? आमदाराने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा
राजकारण

भाजप-शिंदे गटात वाद? आमदाराने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला. यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारवर बोलताना गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती, यावर बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला, किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा – शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजपा व शिंदे गटात ही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमय्या काय म्हणाले होते?
सोमय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, ”मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले.” त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ”मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं. ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणाऱ्याला माफियाच म्हणणार ”

दीपक केसरकरही भडकले-
याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ”उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये.” यावर आपली प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले आहेत की, ”अशा प्रकारची प्रतिक्रिया आपआपल्या पक्षाचे लोक देत असतात. यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.” याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ”आम्ही जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याह सर्व आमदार आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्याला देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. त्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी विनंती केली होती की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही अन्य नेत्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती. त्यांनी (देवेंद्र फडणवीस यांनी) स्वतः भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, जे जेष्ठ नेते असतात, त्यांच्याशी राजकीय वाद होऊ शकतो. परंतु कोणीही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये. असं त्यांनी स्पष्ट सागितलं होतं.” ते म्हणाले, ”आज जे घडलं त्याबद्दल आमचं जे ठरलं होतं ते आम्ही फडणवीस यांना सांगू. सोमय्या हे भाजप नेते आहेत, त्यांना फडणवीस काय ते सांगतील. हे जे घडलं आहे, ते आम्हाला कोणालाही आवडलं नाही.”