कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा
राजकारण

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच, यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रामदास आठवले यावेळी बोलताना म्हणाले की, ”देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. दलित-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. गावागावांत एकी निर्माण व्हायला हवी आणि गावात एकी निर्माण झाली, की देशाचा विकास झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.

दरम्यान, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणताही ठोस प्लॅन नाही, असे म्हटले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता. आठवले म्हणाले की, ”राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. मात्र, अर्थव्यवस्था पट्रीवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल. त्याचबरोबर, नव्या वर्षाच्या संकल्पासंदर्भात विचारले असता, नव्या वर्षात आपण रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. ‘मी रिपब्लिकन’अशी आमची घोषणा असेल, असे आठवले म्हणाले.