नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? मुख्यमंत्री ठाकरेंचा नागपूरकरांना मिश्कील सवाल
राजकारण

नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? मुख्यमंत्री ठाकरेंचा नागपूरकरांना मिश्कील सवाल

मुंबई : सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण पार पडलं. यावेळी बोलताना मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे. नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ”अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली नागपुरात सुरु झालेलं हे नवं कार्यालय आता वर्षभर सुरू राहणार आहे. आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.