भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय
क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय

मेलबर्न : दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. कांगारुंनी दिलेल्या ७० धावांचा पाठलाग करताना भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात अजिंक्य रहाणेचं शतक आणि जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ २०० धावांपर्यंत मजल मारू शकला आणि भारताला विजयासाठी केवळ ७० धावांची आव्हान मिळाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://twitter.com/ICC/status/1343766411747987456

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फलंदाजी केली. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.