आज जिंकलात पण उद्याचा पराभव निश्चित; टीम इंडियाने केली मोठी चूक
क्रीडा

आज जिंकलात पण उद्याचा पराभव निश्चित; टीम इंडियाने केली मोठी चूक

साउदम्प्टन: इंग्लंडच्या त्यांच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी पराभूत करून भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात बाजी मारली. टीम इंडियाने फलंदाजी, गोलंदाजीत कमाल केल्याने हा मोठा विजय साकारता आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाने हा विजय मिळवल्याने खेळाडू आणि चाहते आनंदी आहेत. पण भारताच्या या विजयात उद्याच्या पराभवाची बिजे दिसत आहे. भारताने मोठा विजय मिळवला असला तरी पहिल्या टी-२० सामन्यात एक मोठी डोकेदुखी समोर आली आहे. अर्थात ही पहिली वेळ नाही याआधी देखील असे घडले आहे.

साउदम्प्टन मैदानावर भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकने एक-दोन नव्हे तर तीन कॅच सोडले. एकूण सामन्यात भारतीय संघाने मिळून ६ कॅच सोडले. जर भारताने हे ६ कॅच पकडले असते तर इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळला गेला असता. त्याच बरोबर भारताच्या विजयाचे अंतर देखील कमी झाले असते.

दिनेश कार्तिकने सोडलेल्या कॅचमध्ये हॅरी ब्रूकचा महत्त्वाच्या कॅच देखील होता. त्याने इंग्लंडकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २८ धावा केल्या होत्या. या शिवाय सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी एक कॅच सोडले. सूर्यकुमारने मोईन अलीचा कॅच सोडला, ज्याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. सूर्याने १८ धावांवर त्याचा कॅच सोडला होता. चहलने स्वत:च्या गोलंदाजीवर क्रीस जॉर्डनचा कॅच सोडला. तर दीपक हुड्डाने टायमल मिल्सला जीवनदान दिले.

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला असला तरी फिल्डिंग कमालीची खराब झाली. यामुळे भारताचा पराभव देखील होऊ शकला असता. टीम इंडियाला अजून २ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या चुका टाळल्या नाही तर पराभव होऊ शकतो.