इंग्लंडची पहिल्या डावात केवळ २०५ धावापर्यंत मजल; भारताची खराब सुरूवात
क्रीडा

इंग्लंडची पहिल्या डावात केवळ २०५ धावापर्यंत मजल; भारताची खराब सुरूवात

अहमदाबाद : इंग्लडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही खराब कामगिरी केली आहे. चौथ्या समान्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला केवळ सर्वबाद २०५ धावा करता आल्या. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंग्लंडच्या डावानंतर भारताचाही सुरूवात खराब झाली. शून्य धावसंख्या असतानाच शुभमन गिल बाद झाला. झटपट संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामुळे चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. डाव्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अंडरसनने शुभमनला बाद केलं. भारताची धावसंख्या शून्य असतानाच गिल तंबूत परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मानं सावध सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या एक बाद २४ इतकी होती. रोहित शर्मा १५ धावा, तर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिब्ले डावाची सुरूवात केली. मात्र, सलामी ही जोडी फार काळ मैदानात दम धरू शकली नाही. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात सिब्लेला त्रिफळाचित केलं. सिबलेला पाठोपाठ अक्षरने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला टिपलं. झॅक केवळ ९ धावा करून परतला. त्यानंतर मोहम्मद सिराजने जो रुटचा अडथळा दूर केला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ तर मोहम्मद सिराजने २ बळी घेत साथ दिली.