INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी
क्रीडा

INDvsAUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला; भारताला ५३ धावांची आघाडी

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला असून भारतिय संघाला पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळाली आहे. रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कांगारूंना केवळ १९१ धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले आहे. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२४४ धावांचा पाठलाग करताना कर्णधार टीम पेनचं अर्धशतक आणि मार्नस लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाने जेमतेम १९१ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही खराब झाली. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना बुमराहने पायचीत करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मार्नस लाबुशेनने एका बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्याची भारताकडे चांगली संधी होती. परंतू भारतीय क्षेत्ररक्षकांनी लाबुशेनला तीन जीवदानं देत अत्यंत खराब कामगिरी केली. अखेर स्टिव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड आणि कॅमरुन ग्रीन यांना एकामागोमाग एक माघारी धाडत आश्विनने कांगारुंचा निम्मा संघ माघारी तंबूत पाठवला.

चहापानाच्या सत्रानंतर उमेश यादवने एकाच षटकात लाबुशेन आणि कमिन्सला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. दुसऱ्या बाजूने कर्णधार टीम पेनने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. स्टार्कनेही त्याला उत्तम साथ दिली. अखेरीस स्टार्क आणि लॉयन या तळातल्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. अखेरीस उमेश यादवने हेजलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपवला. कर्णधार टीम पेन ७३ धावांवर नाबाद राहिला.

यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताकडे एकूण ६० धावांची आघाडी झाली आहे. भारतिय संघाला पहिला झटका बसला असून पृथ्वी शॉ माघारी परतला आहे. भारताची धावसंख्या १ बाद ७ अशी झाली आहे.