ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३६९ धावांपर्यंत मजल; भारताच्या २ बाद ६२ धावा
क्रीडा

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३६९ धावांपर्यंत मजल; भारताच्या २ बाद ६२ धावा

नवी दिल्ली : शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर आणि टी. नटराजन यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार टिम पेन आणि कॅमरुन ग्रीन यांनी भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. टिम पेन यानं अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. शार्दुल ठाकूरनं पेनला बाद करत भारताला दिवसातील पहिला बळी मिळवून दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टिम पेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. टिम पेन याच्यानंतर कॅमरुन ग्रीनला सुंदरनं माघारी धाडलं. त्यानंतर लगेच पॅट कमिन्सला शार्दुलनं पायचीत बाद करत भारताला आठवं यश मिळवून दिलं. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायन यानं भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. लायन यानं ४ चौकारासह २४ धावा केल्या. अखेरीस सुंदरनं आपल्या जाळ्यात अडकवत लायनला तंबूत पाठवलं. त्यानंतर नटराजन यानं हेजलवूडलाही तंबूत झाडलं. ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या तीन फलंदाजांनी ५६ धावा जोडल्या. भारताकडून नटरान, शार्दुल आणि सुंदर यांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. युवा शुबमन गिलला कमिन्सनं सुरेख चेंडूवर स्वस्तात माघारी पाठवलं. दुसरीकडे रोहित शर्मा स्थिरवला होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचा समाचार घेत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्मानं ६ चौकारांच्या मदतीन ४४ धावांची खेळी केली. रोहित आणि शुबमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्या ६२ धावा केल्या आहेत. मात्र, चहापानानंतर पावसामुळे खेळ सुरु होऊ शकला नाही.