लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नसून तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज (ता. २४) ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरवल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

वैद्यकीय सुविधांबद्दल मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असेही ठाकरे म्हणाले आहेत.