पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार; ५ जणांचा मृत्यू

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं असून मतदान केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या एका तरुण मतदारावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली. या घटनेमध्ये आनंद बर्मनचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सितालकुचीमध्येच १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये ४ जणांचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रावरील मतदान थांबवण्यात आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सितालकुची भागामध्येच असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १२६वर पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगून देखील जमाव ऐकत नव्हता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा पथकाच्या जवानांवरची शस्त्र हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावातील काहींनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने स्वसुरक्षेसाठी आक्रमक झालेल्या व्यक्तींवर जवानांना गोळीबार करावा लागला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला.

सीआरपीएफच्या गोळीबारात मृत्यू झालेले ४ जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते असा दावा आता तृणमूलकडून केला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा निषेध करत भाजपावर टीका केली आहे. सीआरपीएफने आज सितालकुचीमध्ये ४ जणांवर गोळी झाडली. सकाळी देखील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सीआरपीएफ माझी शत्रू नाही. पण गृहमंत्र्यांच्या निर्देशांवरून एक कट शिजवला जातो आहे. आणि आज घडलेली घटना त्याचा पुरावा आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.