#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद: महाराष्ट्रातही बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकरी संघटनांसह २४ राजकीय पक्षांचा बंदला पाठींबा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. या बंदचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. आजच्या भारतबंदला राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

तर पुण्यातील APMC मार्केटमधील व्यापाऱ्यांनीदेखील भारत बंदला समर्थन दिले आहे. मात्र आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या भारत बंदला कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही, तर या नेत्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजीही केली आणि बेंगळुरूतील विधान सौधा येथील गांधी पुतळ्यासमोर काळे झेंडेही दाखविले. यावेळी पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, रामलिंग रेड्डी आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर, वेगवेगळ्या राज्यांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात कामारेड्डी येथील रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एका बसचालकाने म्हटले आहे, “मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठविला. त्यांना पाठिंबा देत, आम्ही आरटीसीचे कामगार येथे आंदोलन करत आहोत. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये.”

तर दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

या पक्षांचा भारतबंदला पाठिंबा – 1.काँग्रेस 2.माकपा 3.डीएमके 4.सीपीआई 5.राजद 6. एनसीपी 7.जेएमएम 8.सपा 9. शिवसेना 10.अकाली दल 11.भाकपा-माले 12. गुपकार गठबंधन 13.टीएमसी 14.टीआरएस 15.एआयएमआयएम 16. आम आदमी पार्टी 17. पीडब्ल्यूपी 18. बीवीए 19. आरएसपी 20. एफबी 21. एसयूसीआय (सी) 22. स्वराज इंडिया 23.जेडीएस 24. बसपा