महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाढदिवसानिमित्तानं जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ”कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपानं नवं संकट उभं ठाकलं आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. तसंच, राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हंटल आहे.

ते पुढे म्हणाले की, ”बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हायअॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणं तुलनेनं सोपं आहे. पण मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूनं मरण पावले आहेत. त्यामुळे कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. तर दुसरीकडे, राज्यात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार असून दररोज १० हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस राज्याला मिळेल हे एक-दोन दिवसांत कळेल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.