देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी
देश बातमी

देशात कोरोनापाठोपाठ बर्डफ्लूचे थैमान; सात राज्यात अलर्ट जारी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या पाठोपाठ आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. देशातील 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला असून हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूपाला (स्ट्रेन)ला नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी अलर्ट जारी करण्यात आला असून तपासणीसाठी नमूनेही पाठवण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळ : केरळमध्ये बर्ड फ्लूला आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. केरळ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये कोंबड्या आणि बदकांना मारण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूच्या एच5एन8 स्वरूप (स्ट्रेन) ला नियंत्रणात ठेवण्यासाठी 30 हजारांहून अधिक कोंबड्या आणि बदकांना मारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

हरियाणा : हरियाणातील पंचकूला जिल्ह्यातील एका पोल्ट्री फर्ममध्ये गेल्या 10 दिवसांत चार लाखांहून अधिक पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, जालंधरमधील स्थानिक रोग तपासणी प्रयोगशाळेत एका टीमने पक्ष्यांचे नमूने एकत्रित केले आहेत.

हिमाचल : हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात पोंग तलावाजवळ आतापर्यंत 2300 प्रवाशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान, बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. सर्व पक्ष्यांना जमिनीमध्ये दफन करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये असलेल्या गोविंद सागर आणि कोल डॅममध्ये प्रवासी पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेश : देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आरोग्य विभाग आणि पशुपालन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पंजाब: पंजाबमधील तरणतारणमध्ये असतेल्या हरीके पट्टन बर्ड सेंच्युरीमध्ये वन विभागाने कडक पहारा देण्यास सुरुवात केली आहे. येथे दरवर्षी एका लाखांहून अधिक प्रवासी पक्षी येतात.

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये एका आठवड्यात 2500 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यांचे नमूने भोपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं असून राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थान : राजस्थान सरकारने सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींनुसार, मानवासाठी धोका नाहीये. मात्र राजस्थानच्या बारांमध्ये 100 हून अधिक पक्ष्यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यानंतर वनविभागाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.