जिल्हानिहाय कोरोना पॉझिटिव्हीटीची आकडेवारी जाहीर
बातमी महाराष्ट्र

जिल्हानिहाय कोरोना पॉझिटिव्हीटीची आकडेवारी जाहीर

मुंबई : कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आज प्रथमच राज्य सरकारने जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानुसार, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळं मुंबईसह बहुतेक जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याने आज कोरोनाच्या स्थितीची १० जूनपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कोरोनाचा जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची माहिती आहे.

‘या’ जिल्ह्यांचा कोरोनाचा दर पाच टक्क्यांच्या खाली :
मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

‘या’ जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक..
कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६७.४१ टक्के ऑक्सिजन बेड सध्या फुल्ल आहेत. सातारा जिल्ह्यात ४१.०६ टक्के तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१.५९ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत. या जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर अनुक्रमे १५.८५, ११.३० आणि ११.८९ इतका आहे.

दरम्यान, मुंबई वगळता बहुतेक जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे झाले आहेत. या आकडेवारीच्या आधारे संबंधित जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी येत्या सोमवारपासून निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.