पूरपरिस्थितीत अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला महत्वाचा सल्ला
बातमी महाराष्ट्र

पूरपरिस्थितीत अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला महत्वाचा सल्ला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये आलेल्या महापुराचा अनुभव गाठीशी असताना आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तशीच स्थिती निर्माण होतेय की काय, असं चित्र दिसू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुभवाच्या जोरावर राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्य सरकारला काही सल्ले दिले आहत. कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे, असं फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर अलमट्टी धरणातून कर्नाटकमध्ये विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आत्ताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

त्याचबरोबर, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, असं ट्वीटमध्ये फडणवीसांनी म्हटलं आहे.