७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

”उद्याचा भारत बंद हा शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचा भारत बंद आहे. मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी भाजप सरकार शेतकरीविरोधी, कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. भाजपाच्या पाठीशी आता रामही उभा राहणार नाही, #किसानों_के_संग_भारत_बंद” असे ट्वीट करत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यतील जनतेला भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, “७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा!”, असं ट्विट करत जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही थोरात यांनी केलं आहे. याशिवाय, शेतकरी आंदोलन व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रिगल सिनेमाजवळील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांनी नव्याने लागू करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येत आहे.

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. या बंदमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस पक्षाने केलं आहे.

दरम्यान, तर, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे.

त्याचबरोबर भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसंदर्भात सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. शेतकऱ्यांनी गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर वेढा दिला असून मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त लावला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बंद पाळण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या लोकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.