नवी दिल्ली : भारत चीनला एक मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनंतर आता भारत चीनची दिग्गज टेक कंपनी Huaweiवर बंदी घालण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल असं सांगण्यात येत आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
चीनच्या Huawei या कंपनीच्या दूरसंचार उपकरणांचा वापर करण्यापासून भारतातील मोबाईल कंपन्यांना रोखलं जाईल, असं सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. १५ जूननंतर टेलिकॉम कंपन्यांना केवळ सरकारद्वारे परवानगी देण्यात आलेल्या काही ठराविक कंपन्यांकडूनच उपकरणं खरेदी कारावी लागतील. तसेच ज्या कंपन्यांकडून उपकरणं खरेदी करता येणार नाहीत त्यांची ब्लॅकलिस्टही जारी केली जाईल. या ब्लॅकलिस्टमध्ये Huawei कंपनीचं नाव असू शकतं, असंही या दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
भारतात एखादी कंपनी गुंतवणूक करत असताना भारतीयांच्या सुरक्षेला धक्का लागत असेल तर अशा परिस्थितीत आर्थिक फायदा-तोटा न पाहता जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल, असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, ZTEकॉर्प या चिनी कंपनीलाही भारतात बंदी घातली जाऊ शकते, असं अन्य एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितलं. दोन्ही कंपन्या आपल्या उपकरणांद्वारे चिनी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.