धक्कादायक! रत्नागिरीत अज्ञाताने धरणाच्या दरवाज्याचं कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडला अन्..
कोकण बातमी

धक्कादायक! रत्नागिरीत अज्ञाताने धरणाच्या दरवाज्याचं कुलूप तोडलं, पाण्याचा मोठा लोंढा बाहेर पडला अन्..

रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते व धरणाचे दरवाजे अर्धवट उघडण्यात आले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये याची लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणी नेमकं कोण सोडते, यामागचे गौडबंगाल काय आहे या सगळ्याचा शोध घेण्याचे आव्हान खेड पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या धरणावर सुरक्षारक्षकच नेमलेला नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले. कुलूप तुटल्यामुळे धरणातील लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. धरणासारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं दिसतंय. पुढे काही दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.