नांदेड : देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला असल्याचे खंत व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता व अनेकदा खडतर परिस्थितींवर मात केली होती. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण म्हणाले, आमदार रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. ते अतिशय अभ्यासू होते. देगलूरच्या विकासासाठी त्यांच्या अनेक संकल्पना होत्या व त्याअनुषंगाने ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने केवळ देगलूर नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम नेतृ्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक स्नेही गमावला आहे.