मोठी बातमी! अखेर राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! अखेर राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द

मुंबई : केंद्र सरकारने सीबीएसई पॅटर्नच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काल (ता. ०३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे.

आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले.