मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात तब्बल १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या जवळपास ५ महिन्यांमध्ये राज्यात ही २४ तासांमधली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
तसेच, राज्यात ५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात ७ मार्च रोजी ११ हजार १४१, ८ मार्च रोजी ९ हजार ०६८ तर ९ मार्च रोजी १२ हजार १८२ नवे कोरोनाबाधित सापडले होते. त्यामुळे कोरोनाचा राज्यातला आलेख वरच चढत असल्यामुळे प्रशासनासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे.
आजच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात ९ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २० लाख ९९ हजार २०७ इतकी झाली आहे. करोनाचा रिकव्हरी रेट यामुळे अजूनही ९३.२१ टक्क्यांवर असला, तरी नवीन रुग्णवाढीचा दर वेगाने वाढू लागला आहे. आजच्या नव्या कोरोना बाधितांच्या संख्येची भर पडल्याने राज्यातल्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९९ हजार ००८ वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ६१० झाला आहे.