देशात महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा – डॉ. हर्षवर्धन
देश बातमी

देशात महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवठा – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोनाने देशात अक्षरशः कहर केला असून महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या ही गंभीर बनली आहे. राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भूमिका मांडत देशात सर्वाधिक लसपुरवठा महाराष्ट्राला केला असल्याचे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. हर्षवर्धन यांनी आजतक सीधी बात या कार्यक्रमात बोलताना लस तुटवडा आणि पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. लस तुटवड्यावर बोलताना हर्षवर्धन म्हणाले, अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

कोव्हॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण केलं जात आहे. छत्तीसगढमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. दोन महिन्यांपर्यंत त्यांनी लसीकरणच सुरू केलं नाही. मी आरोग्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र पाठवलं. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. कोव्हॅक्सिन लस लोकांना देणार नाही म्हणत तीन महिन्यांपर्यंत फक्त राजकारण करत राहिले. आता मार्च अखेरीपासून लसीकरण सुरू केलं आहे, असंही हर्षवर्धन म्हणाले.