राज्यात पुन्हा घटली रुग्णसंख्या; मृतांच्या आकड्यातही घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा घटली रुग्णसंख्या; मृतांच्या आकड्यातही घट

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण २० हजार ७४० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ लाख ९२ हजार ९२० इतका झाला आहे. मात्र, त्यातले फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून ५००च्या खाली उतरला आहे. आज दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर १.६४ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, मृतांचा आकडा नियंत्रणात कसा आणता येईल आणि मृत्यू टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. आजच्या आकड्यांची भर पडल्यानंतर राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.