महाराष्ट्र बंद: बेस्टची तोडफोड, पीएमपी, टीएमटी बंद
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद: बेस्टची तोडफोड, पीएमपी, टीएमटी बंद

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीय. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे. मुंबईत बेस्ट, पुण्यातील पीएमपी व ठाण्यातील टीएमटी बस सेवांना या बंदचा फटका बसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं बंदला पाठिंबा दिल्यामुळं अनेक बस पहाटेपासून आगारातच आहे. त्यामुळं अनेक नोकरदारांना ऑफिस गाठण्यासाठी रिक्षा व टॅक्सीचा पर्याय शोधावा लागला.

तसंच, बंद सुरू झाल्यानंतर काल मध्यरात्रीपासून ते पहाटे दरम्यान बेस्ट बसच्या नऊ गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेस्ट बसच्या आठ गाड्या व भाडे तत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं बेस्ट व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून जोपर्यंत संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गाड्या आगारातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळं आज मुंबईच्या रस्त्यावर तुरळक बेस्ट धावत आहेत.

नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद
नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर महापालिका परिवहन उपक्रमांची एनएमएमटी बस सेवा काही वेळेपुरती सकाळ सत्रात सुरू केली होती. मात्र बेस्टने बस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनएमएमटी व्यवस्थापकांनी 75 मार्गावर धावणाऱ्या दोनशे बस 11 वाजता बंद केल्या. अनेक शाळांमध्ये 8 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. शहरातील सर्व बाजार, दुकाने,हाॅटेल बंद ठेवण्यात आले आहेत.