राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर
देश बातमी

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जाहीर; दारू रिचवण्यात महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र दारु पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊननंतर राज्य सरकारने सर्वात प्रथम दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दारुच्या दुकानावर मद्यप्रेमींच्या भल्या मोठ्या रांगा बघून महाराष्ट्रात तळीरामांची संख्या सर्वाधिक असेल, असं प्रत्येकाला वाटलं होतं. पण दारु पिण्यात महाराष्ट्राच्या पुढेही दोन राज्ये आहेत.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याच्या तिजोरीत 7 हजार 807 कोटी रुपयांची भर पडली. तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन राज्ये दारु पिणाऱ्यांच्या संख्येत पुढे आहेत. तर बिहारमध्ये दारु बंदी असतानाही दारु पिणाऱ्यांच्या प्रमाणात ते राज्य महाराष्ट्राच्याही पुढं असल्याचं दिसून आलं आहे. तर दारु रिचवण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दारुबंदी असणारे बिहार मद्यपानात आघाडीवर
महाराष्ट्रापेक्षाही बिहारमध्ये दारु पिणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. दारुबंदी असतानाही बिहारमध्ये 15 वर्षावरील 15.5 टक्के लोक दारु पितात तर महाराष्ट्रात हे प्रमाण 13.9 टक्के इतकं आहे.

गोवा राज्य मागे
गोव्यात दारु मुबलक प्रमाणात मिळते हे सर्वांनाच माहित आहे. असे असूनही गोवा राज्य दारु पिणाऱ्यांच्या संख्येत सर्वात मागे आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 या अहवालानुसार तेलंगणामध्ये पिणाऱ्यांची संख्या देशात सर्वात जास्त आहे. तर दुसर्याला क्रमांकावर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. दारुबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. मद्यपान करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे जास्त अंतर नाही.

सिक्कीममध्ये महिला सर्वात जास्त दारु पितात
देशाच्या अन्य भागाच्या तुलनेच ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात असं या अहवालातून स्पष्ट झालंय. सिक्कीममध्ये मद्य पिणाऱ्या महिलांचे प्रमाण संपूर्ण देशात जास्त आहे. सिक्कीममधील 16.2 टक्के महिला मद्यपान करतात असं समोर आलं आहे. आसाममधील मद्य प्राशन करणाऱ्या महिलांची टक्केवारी 7.3 टक्के इतकी असून याबातीत हे राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. या राज्यातील महिलाही दारु रिचवण्यात पुढे असून महिलांच्या दारु पिण्याच्या बाबतीत या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.

शहरातील महिलांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण जास्त असते असेही म्हटले जाते. परंतु या अहवालानुसार शहरी महिलांपेक्षा खेड्यातील महिला या दारु पिण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला आपण दारु पितो हे सांगताना संकोच करीत नसल्याचंही अहवालात नमूद करण्य़ात आलं आहे.