राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
बातमी महाराष्ट्र

राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकॉसिक (Mucormycosis) अर्थात काळी बुरशी या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये झुकतं माप द्यायला हवं, अशी देखील मागणी टोपे यांनी केली आहे. पुढचे १० दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वत: केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधल्या उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. एका किलोमध्ये २० हजार इंजेक्शन तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे, टोपे म्हणाले.

म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांविषयी ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. दरम्यान, यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळतील, असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.