शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले, जर चर्चाच नसेल तर…

नवी दिल्ली : ‘सध्याच्या घडीला कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत एएनआयला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ”आमचं सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगेल आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल. जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, ”मी विदर्भातला आहे, तिथे १० हजार गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्याचं राजकारण करता कामा नये. शेतकरी, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर बदल करण्यास तयार आहोत. नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही. सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.