कोकणात ऑरेंज अलर्ट, तर अशी असेल असेल मुंबई-पुण्याची स्थिती
कोकण बातमी

कोकणात ऑरेंज अलर्ट, तर अशी असेल असेल मुंबई-पुण्याची स्थिती

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशात आज दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन तासांत ठाण्यासह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशी असेल मुंबई-पुण्याची स्थिती
मागील दोन दिवसांपासून मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्रीपासून सलग दोन दिवस मुंबईत तर पावसानं धूमशान घातलं होतं. आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र, घाट परिसराला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून मुंबईसह ठाणे परिसरात अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते तुंडुंब भरल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात येत आहेत. आजही मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.