सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन
देश बातमी विदेश

सरकारला न आवडणाऱ्या लोकांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं: अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

नवी दिल्ली : “सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं. तसेच त्यांना जेलमध्ये पाठवलं जाऊ शकतं” असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे. अमर्त्य सेन यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. तसेच, केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन, आणि स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांना तर संधीच दिली जात नाही. असेही सेन यांनी म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्थतज्ञ अमर्त्य सेन आता ८७ वर्षांचे असून ते अमेरिकेतील हार्वर्ड विश्वविद्यालयात प्राध्यापक आहेत. सेन यांनी देशात चर्चा आणि मतभेदांना वाव दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकार दडपसहीच्या मार्गाने देशातील नागरिकांवर देशद्रोहाचे आरोप लावून कोणत्याही पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकत आहेत. कन्हैया कुमार, शेहला राशिद आणि उमर खालिद सारख्या युवा नेत्यांसोबत शत्रूप्रमाणे व्यवहार केला जात आहे. शांततापूर्ण प्रकारे पुढे जाण्याची संधी द्यायला हवी होती मात्र दडपशाहीप्रमाणे वागणूक दिली जात आहे” असं देखील अमर्त्य सेन यांनी म्हटलं आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देखील त्यांनी समर्थन दिलं आहे. सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास 26 जानेवारीला राजपथवर ताबा मिळविण्याची रणनीती शेतकरी आखत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मंगळवारी चर्चेची तयारी दर्शविली होती. ही बैठक बुधवारी होईल.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 33 दिवस पूर्ण झाले आहेत. दिल्लीतील पाच सीमांवर जवळपास दोन लाख शेतकरी कडाक्याच्या थंडीत कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी जीवाची पर्वा न करता बसले आहेत.

सरकारने 30 ला दुपारी 2 वाजता बैठक घेण्याचे मान्य केले आहे. मंत्रीगट आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठकीची ही सातवी फेरी असेल. तयारी करण्यासाठी सरकारने एक दिवस अधिक वेळ मागवून घेतला आहे. शेतकऱ्यांनी मात्र, चर्चेसाठी 4 मुद्दे पाठविले असून त्यावरच चर्चा करावी असा दबाव सरकारवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांचा आढावा घेण्यास भक्कम आधार अस्तित्त्वात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, विश्वभारती विद्यापीठाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला अतिक्रमण करणाऱ्यांची एक यादी पाठवली. या यादीत अमर्त्य सेन यांच्या नावाचाही समावेश आहे. विश्व भारतीच्यावतीने सेन यांच्या दिवंगत वडिलांना जमीन कायदेशीररित्या भाड्यानं दिली होती असं विद्यापीठाने म्हटलं आहे. मात्र विद्यापीठाच्या कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केल्याचं वृत्त सेन यांनी फेटाळून लावलं आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अमर्त्य सेन यांना पाठिंबा दर्शवला आहे.