आठ दिवसांत पडणार ठाकरे सरकारची तिसरी विकेट
राजकारण

आठ दिवसांत पडणार ठाकरे सरकारची तिसरी विकेट

मुंबई : पुढच्या आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी विकेट पडणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथून व्हर्च्युअल माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपने हे प्रकरण लावून धरल्यावर गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. यापाठोपाठ १०० कोटींच्या वसुलीबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला असून आता येत्या आठ दिवसांत तिसरी विकेट पडेल असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे तिसरी विकेट कोणाची पडणार किंवा भाजपच्या रडारवर आता कोण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मंत्र्यांनी काही केलं नाही असं खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकलं की राजीनामा घेत आहात एक नाही आणि दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. काल एकाने चांगली कमेंट केली की ३६ बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचं काय. उरलेल्यांची रांगच लागणार रआहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात. पण सर्वसामान्यांचं नुकसान करु नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.