धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे
राजकारण

धनंजय मुंडेनीही राजीनामा द्यावा; पंकजा मुंडे

मंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला जावा अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या की, ” आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे. तसेच, जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता याची चौकशी व्हावी आणि पूजाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली. संजय राठोड यांनी फार आधी पदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही असं म्हणत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला गेलाच पाहिजे हीच बाब त्यांनी उचलून धरली. तसेच या प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित मार्गाने होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.