सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका
राजकारण

सर्व संस्था मोदींच्या ताब्यात; कंगना, अर्णब यांच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाणांची टीका

मुंबई- अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने दिलेल्या सूचनांवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काम होताना दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत चव्हाण म्हणाले, की या निकालाचा अभ्यास सुरू आहे. जर काही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाडय़ाबाबत आम्ही काही बोलणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पस्तीस हजारापेक्षा जास्त महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित असताना न्यायालयाने राजकीय दृष्टय़ा सोयीचे ते खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण हे खटले सुनावणीला घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळच नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट होते.

केंद्र सरकारच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.