महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला
राजकारण

महाराष्ट्र पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का?; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : “राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी,” असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दादरा नगर हवेलीचा भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण आणि रायपूर येथील सरकारी अधिकाऱ्यानं नागपूरात येऊन केलेली आत्महत्या प्रकरणी आज राज्याच्या विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपचं प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत आहेत आणि महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या आशेनं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुसाईड नोटमध्ये करत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. यावेळी अनिल देशमुख यांनी रायपूर मध्यप्रदेशात येत असल्याचा उल्लेख केला. देशमुखांच्या याच दावाच्या धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधला.

मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनी केली असावी, असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिरेन यांच्या पत्नीने केली आहे. अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

वरील एकंदरीत परिस्थितीवरून माझे पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा आणि खून सचिन वझेंनी केला असावा, अशी मला शंका आहे, अशी गंभीर शंका हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीतून केली आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरी बाब म्हणजे मनसुख हिरेन यांची कार गेल्या काही महिन्यांपासून सचिन वझेंकडे होती. त्यांनी फेब्रुवारीत ती परत केली होती. दरम्यान, एवढे पुरावे असताना सचिन वझेंना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.