राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी
राजकारण

राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका; देशाला विकणारेच क्रॉनीजीवी

नवी दिल्ली : ”मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली होती. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर देत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला ‘आंदोलनजीवी’ हा नवा शब्द मिळाल्याचं सांगत शेतकरी आंदोलकांवर टीका केली होती. आता त्यांच्या याच शब्दाचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर ‘क्रॉनीजीवी’ असल्यांची टीका केली आहे. सरकारच्या या धोरणावर आता राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “क्रॉनीजीवी आहेत ते, जे देशाला विकत आहेत.” राहुल गांधींनी या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारचे आणि उद्योगपतींचे लागेबांध असल्याची टीका केली आहे. तसेच केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक कमी करुन त्या कंपन्या खासगी उद्योगपतींच्या घशात घालत आहे असाही आरोप केलाय.

दरम्यान, या आधीदेखील राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत केंद्रसरकारवर निशाणा साधला होता. “अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्योगपती देव आहेत.” पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं असा आरोप केला होता.

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने 2021 सालासाठी 1.75 लाख कोटी इतकं निर्गुंतवणुकीचं लक्ष ठेवलं आहे. त्यासाठी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपली गुंतवणूक कमी करुन खासगी क्षेत्राला गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली असून मोदी सरकार हे सामान्यांसाठी काम करत नसून त्यांच्या काही उद्योगपती मित्रांच्या भल्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला होता.