कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा;  हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….
राजकारण

कॉंग्रेसचा महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा; हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर….

मुंबई : ‘हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसनं मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला असल्याचं समोर आलं आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. ट्वीट करत यशोमती ठाकूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.