तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल; सतेज पाटलांचा इशारा
राजकारण

तर आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल; सतेज पाटलांचा इशारा

कोल्हापूर : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक लागू केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या निर्णयावर कोल्हापूरचे सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना न रोखता त्याची RTPCR टेस्ट करून राज्यात प्रवेश करायला परवानगी द्यावी. अन्यथा आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हालादेखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेबाबत मी केंद्राला माहिती देणार आहे,” असे सतेज पाटील म्हणाले. तसेच, कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

तसेच, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.