भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना
राजकारण

भाजपाची एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

मुंबई : ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.” असं म्हणत शिवसेनेने भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मात्र विरोधी पक्षाने टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. याच मुद्द्यावरून शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तसेच, ”वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.” अशा शब्दात भाजपावर खोचक टीकाही केली आहे.

वाचा काय लिहिले आहे अग्रलेखात
महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱयांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.

महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले. सगळय़ात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष विजयी होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व पंचवीसेक वर्षे केले, पण त्याआधी गंगाधरपंत फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू संघ नेते नागपूरकर पदवीधारकांचे नेतृत्व विधान परिषदेत करीत होते. सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंतांचे सुपुत्र. त्यामुळे हा मतदारसंघ किती संघमय झाला होता ते कळेल. संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये.

अमरावती शिक्षक मतदारसंघातही आधीचे उमेदवार नितीन गडकरी यांना मानणारे होते. जोशी हे फडणवीस कंपूचे. नागपुरातील दोन कंपूत भाजप फुटला आहे हे कटुसत्य आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळय़ातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात पन्नास हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले. या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा. भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱया दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱयांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही. ‘‘विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.