भाजपा-मनसेची युती होणार? भाजपाने दिले ‘हे’ उत्तर
राजकारण

भाजपा-मनसेची युती होणार? भाजपाने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि भाजपाच्या युतीच्या चर्चांवर पडदा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र लढणार आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र, दोन्ही पक्षांकडून यावर अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली नव्हती. अखेर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर युतीसाठी एक अटही घातली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत असताना त्यांनी भाजपा-मनसे युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ”जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, ”आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही. युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांना रश्मी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ”“माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे.”