भारताची इंग्लंडला क्लिन स्वीप; एकदिवसीय मालिकाही २-१ने जिंकली
क्रीडा

भारताची इंग्लंडला क्लिन स्वीप; एकदिवसीय मालिकाही २-१ने जिंकली

पुणे : भारतीय दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाला भारतीय संघाने क्लिन स्वीप दिली आहे. भारतीय दौऱ्यावर इंग्लंडच्या संघाला एकही मालिका जिंकता आली नाही. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 धावांनी रंगतदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यामुळे भारताला या सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात झोकात झाली खरी, पण त्यानंतर त्यांना धक्के बसत गेले. भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला ३५ धावांवर बाद केले. स्टोक्स बाद झाल्यावर डेव्हिड मलानने यावेळी ५० धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शार्दुल ठाकूरने त्यानंतर मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले. शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्यावर इंग्लंडचा संघ यावेळी बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर मोइन अली आणि सॅम करन यांनी काही काळ फलंदाजी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

https://twitter.com/BCCI/status/1376241733701300224

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारता येऊ शकली. परंतु शेवटच्या षटकांत भारताने विकेट्स गमावल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते.