शार्दूल-सिराजचा भेदक मारा; भारतासमोर ३२८ धावांचं आव्हान
क्रीडा

शार्दूल-सिराजचा भेदक मारा; भारतासमोर ३२८ धावांचं आव्हान

ब्रिस्बेन : शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यापुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. वॉर्नर-हॅरिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी केली. बॉर्डर गावसकर चषकातील ही पहिल्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागिदारी ठरली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्मिथनं सर्वाधिक ५५ धावा काढल्या. त्याव्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर (४८), हॅरिस (३८), लाबुशेन (२५), कॅमरुन ग्रीन(३७) आणि कर्णधार पेन (२७) यांनी झटपट धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरनं प्रभावी गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजनं पाच बळी मिळवले तर शार्दुल ठाकूरनं ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांन तंबूत धाडलं. अष्टपैलू संदरला एक बळी मिळाला. गाबाच्या मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचं आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलं नाही. शिवाय, मागील १०० वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभव झाला नाही.

तत्पूर्वी भारताने फलंदाजी करण्यास सुरुवात केली असून पावसामुळे खेळात व्यत्यय आला आहे. खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर रोहित शर्मा ४ धावांवर आणि शुभमन गिल शून्य धावांवर खेळत आहेत. भारताची धावसंख्या १.५ षटकांत बिनबाद ४ झाली आहे.

दरम्यान, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियानं तर तुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला होता. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.