टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी गुड-न्यूज; बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय
क्रीडा

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी गुड-न्यूज; बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून भारतीय संघाची चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल झाले आहेत. ६ दिवसाचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर तीन-चार दिवस सराव करून दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत. त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय संघ सध्या क्वारंटाइन असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. एकूण तीन वेळा ही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तीनपैकी पहिल्या कोरोना चाचणीत सर्व भारतीय खेळाडू पास (निगेटिव्ह) झाले असून त्यांना हॉटेल रूममध्ये वर्कआऊट व व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संघाचे तंदुरूस्ती तज्ञ्ज निक वेब आणि सोहम देसाई यांच्या देखरेखीखाली भारतीय खेळाडूंना व्यायाम व कसरत करता येणार आहे.

त्याचबरोबर दुसरी बातमी अशी की, पहिल्या चाचणीत कोणत्याही खेळाडूमध्ये करोनाची लक्षणे न आढळल्याने बीसीसीआयने सर्व खेळाडूंना आपल्या कुटुंबाला हॉटेल रूममध्ये सोबत ठेवण्यास परवानगी दिली आहे. नुकताच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला. त्यासाठी भारतीय संघ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात होता. त्यामुळे गेली दोन-अडीच महिने भारतीय खेळाडू कुटुंबापासून दूर होते. मात्र आता बीसीसीआयने खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिल्याने ही खेळाडूंच्या दृष्टीने चांगली बातमीच मानली जात आहे.