ICC World Test Championship : भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय
क्रीडा

ICC World Test Championship : भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यावर त्याचा अप्रत्यक्ष फायदा गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला. त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळालं आहे. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यानुसार सध्या भारत पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. WTCच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असल्यास आगामी कसोटी मालिकेत भारतीय संघाला किमान दोन कसोटी सामने जिंकणं गरजेचं आहे.

तसेच इंग्लंडला एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकण्यापासून रोखायचं आहे. या मालिकेचा निकाल ४-०, ३-०, ३-१, २-०, २-१ यापैकी काहीही आला तरी भारताचे अंतिम फेरीचे तिकीट पक्के होईल. पण मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने ४-०, ३-०, ३-१ यापैकी काहीही लागला तरी इंग्लंडसाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडतील.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटली किंवा अनिर्णित राहिली तर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. याशिवाय, जर भारत दोनपेक्षा जास्त सामने हारला आणि इंग्लंडला तीनपेक्षा जास्त सामने जिंकता आले नाहीत तरीही कांगारूंना अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. म्हणजेच मालिका ०-०, १-१, २-२ अशी सुटली किंवा निकाल भारताच्या बाजूने १-० असा लागला किंवा निकाल इंग्लंडच्या बाजून १-०, २-०, २-१ यापैकी काहीही लागला तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत धडक मारेल.