महिलांना ३३ टक्केच आरक्षण का?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल
महिला विशेष

महिलांना ३३ टक्केच आरक्षण का?; प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला खासदारांनी आपले विचार मांडले. महिला आरक्षणाचा मुद्द्यावर महिला खासदारांनी भूमिका मांडल्या. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांची संख्या निम्मी असताना प्रस्ताव ३३ आरक्षणाचाच का?, असा सवाल उपस्थित केला. तसेच, महिलांना ५० टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणीही केली. तर यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनीही महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ”देशात २४ वर्षांपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता हे वाढवण्याची गरज आहे. ३३ टक्क्यांवरून ५० टक्के करायला हवं. देशात महिलांची संख्या एकूण लोकसंख्येपैकी अर्धी असताना संसद आणि विधिमंडळात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळायला हवं,” असं चतुर्वेदी यांनी सभागृहात सांगितलं.

“लॉकडाउनच्या काळात महिलांवर प्रचंड ताण पडला. कौटुंबिक त्रासापासून ते मानसिक तणाव याचाही सामना महिलांना करावा लागला. त्यामुळे या विषयांवर सभागृहात विस्तृतपणे चर्चा व्हायला हवी आणि महिलांना हक्क मिळायला हवेत. महिलांना त्यांचे अधिकार देणं आवश्यक आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबद्दल सदनात भाष्य केलं, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनीदेखील एक ट्वीट केलं. “तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान ३३ टक्के तिकिटं ही महिलांनाच देण्यात यावी,” असं आवाहन त्यांनी केलं.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिला इतिहास आणि भविष्य घडविण्यात सक्षम असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. महिला इतिहास घडवू शकतात. कुणाला हे रोखण्याची परवानगी देऊ नका, असंही ते म्हणाले.