मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ
राजकारण

मोठी बातमी! नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला पक्षश्रेष्ठींकडून बळ

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिली आहे. पटोले आणि राज्य प्रभारी एस.के. पाटील यांनी आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दीड तास चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी, नाना पटोले यांनी स्वबळावर का निवडणूक लढवली पाहिजे, याबद्दल आपली भूमिका मांडली. त्यानंतर राज्यात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढल्यास फायदा होईल. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वबळाला मंजुरी दिली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत सर्व चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत दिल्लीत दाखल झाले होते. पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली होती. मात्र, या भेटीच्या वेळी नाना पटोले हजर नव्हते. त्यानंतर नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आणि त्यांना राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे नाना पटोले यांचे वजन आणखी वाढले आहे.

मध्यंतरीच्या काळात नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सुद्धा आपला पक्ष वाढवण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. खुद्द शरद पवार यांनी नाना पटोले यांची स्वबळाची मागणी ही रास्त आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हटलं होतं. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार की समन्वयाचा मार्ग निवडणार हे पाहण्याचे ठरणार आहे.