संसर्ग रोखण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लॅन; निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

संसर्ग रोखण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लॅन; निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर…

मुंबई : राजधानी मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे. राज्यसरकार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने निर्बंध लागू केले असून चाचण्यांवर भर दिला आहे. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी ग्राहकांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘इंडिया टुडे’ला बोलताना सांगितले की, ”मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेनं २२ मार्चपासून सर्व मॉल्ससाठी स्वॅब संकलन केंद्र सक्तीचे करण्यात आलं आहे. यासाठी मॉलच्या प्रवेशद्वारावरच पथक नियुक्त केलं जाणार असून, याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल असं. लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधणं खूप अवघड काम आहे. अशी व्यक्ती जर मॉल वा इतर गर्दीच्या ठिकाणी गेली, तर संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता मॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा किंवा स्वॅब देणे सक्तीचं असणार आहे,” असं काकाणी यांनी सांगितलं.

आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, ”शहरात आढळणाऱ्या बहुतांश करोनाबाधित रुग्णांमध्ये प्राथमिक लक्षणे फुप्फुसांशी निगडित न आढळता अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार, डोकेदुखी इत्यादी लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यामुळे कोणत्याही अन्य कारणांशिवाय अशी लक्षणे आढळल्यास तातडीने करोनाच्या चाचण्या करण्याचे तज्ज्ञांनी सूचित केले आहे.

तर, फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित म्हणाले की, ”बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित आहेत. परंतु ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतात, त्यात अनेकांना सुरुवातीला अतिसार, जुलाब असे पोटाचे विकार होतात आणि त्यानंतर त्यांना ताप येतो. यापूर्वी रुग्णांमध्ये सर्दी आणि ताप हीच लक्षणे प्रामुख्याने दिसत होती.”