नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे. दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली,
सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये सात आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बोगस विद्यापीठं असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असं या विद्यापीठाचं नाव आहे.