शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला
देश बातमी

शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच; पुढची बैठक ९ तारखेला

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर आणखी कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबत सुरु असलेली आजची बैठक संपली असून आता पुढची बैठक ९ डिसेंबरला होणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. ९ तारखेला दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरयाणा, पंजाबमधले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. तिथे ते आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ठोस तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत म्हणून ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या भारत बंदचीही हाक दिली आहे.

एमएसपीला कुठलाही धोका नाही असं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. एपीएमसीला बळकटी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. या सगळ्या आंदोलनातून तोडगे काढण्यासाठी जर शेतकरी नेत्यांनी दिले तर आम्ही त्यांचा विचार करु असंही त्यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठीचंच सरकार आहे त्याला समृद्ध करणं हे आमच्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे असंही तोमर यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या माध्यमातून मी शेतकरी नेत्यांना हे सांगतो आहे की आंदोलनात जे वृद्ध आणि लहान मुलं आहेत त्यांना घरी पाठवावं. वाढती थंडी आणि कोरोनाचा धोका लक्षात घ्यावा. काही नेत्यांनी आम्हाला तोडगा सांगितला तर शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेऊ असंही तोमर यांनी स्पष्ट केलं आहे.