कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र बातमी

कोल्हापूर हादरले! अपहरण करून मुलाचा खून, नरबळी असण्याची शक्यता

कोल्हापूर : बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात घडला आहे. मुरगूड येथील या बालकाचे चार दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, याप्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी मारुती वैद्य या आरोपीला याप्रकरणात ताब्यात घेतले आहे. कागल तालुक्यातील सोनाळी गावात डॉ. रवींद्र पाटील हे राहतात. त्यांचा मुलगा आजोबांच्या घरी वास्तुशांती समारंभासाठी चार दिवसापूर्वी सावर्डे बुद्रुक या गावी गेला होता. कार्यक्रम संपल्यावर १७ ऑगस्टपासून तो बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी कागल तालुक्यातील मुरगूड पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच चार दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. कागल, कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकातही याचा शोध घेतला गेला पण तो आढळला नाही.

दरम्यान, आज सकाळी सावर्डे बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने, त्याचा खून करून मृतदेह तलावात टाकला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर, मुलगा होत नसल्याने डॉक्टरच्या मित्रांनेच हा प्रकार केल्याची माहिती देखील समोर येत आहे. मुलगा व्हावा यासाठी नरबळी देण्यासाठी हा प्रकार केल्याचीही देखील चर्चा आहे. पोलिसांनी पकडलेला आरोपी मारुती वैद्य हा डॉ. रवींद्र पाटील यांचा मित्र असल्याची देखील माहिती समोर आली आहे.